अटल सेतूमुळे मोरा-मुंबई जलवाहतुकीवर परिणाम , दिवसाची प्रवासी संख्या ५०० वरुन घटून २५० वर; बोटमालक अडचणीत

By Raigad Times    03-Dec-2024
Total Views |
 uran
 
उरण | स्वातंत्र्यपूर्व काळापासून उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान मोरा मुंबई जलसेवा सुरू आहे. मात्र जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली उरण नेरुळ, बेलापूर लोकल व अटल सेतुमुळे उरणच्या मोरा ते मुंबई या जलमार्गावर परिणाम झाला असून दिवसाची ५०० असलेली प्रवासी संख्या घटून २५० वर येऊन पोहचली आहे. त्यामुळे या मार्गावरील फेरीसाठी येणारा खर्चही निघत नसल्याने जलवाहतूक करणारे बोटमालक अडचणीत आले आहेत.
 
ब्रिटिश काळापासून मुंबईत ये-जा करण्यासाठी उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यानची जलसेवा सुरू आहे. मुंबईत अवघ्या अर्ध्या ते एक तासात या मार्गाने पोहचता येते. त्यामुळे उरण मधील चाकरमानी, व्यवसायिक आणि सर्वसामान्य प्रवासी ही याच मार्गाचा वापर करीत होते. मात्र १२ जानेवारीपासून उरण ते नेरुळ, बेलापूर ही लोकल सेवा तसेच खासगी वाहनांच्या माध्यमातून प्रवास करता येईल असा उरणला जोडणारा अटलसेतू हा सागरी मार्ग असे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
 
uran
 
सध्या उरणवरून थेट मुंबई सीएसएमटी गाठता येत नसली तरी अवघ्या २० रुपयांत सर्वात स्वस्त व जलद गतीने मुंबईत जाता येत असल्याने लोकलने प्रवास करण्यास प्रवाशांनी पसंती दिली आहे. दुसरीकडे अटल सेतूने खासगी वाहनाने अवघ्या २५ मिनिटांत मुंबईत जाता येत असल्यामुळे या दोन्ही मार्गाचा अवलंब करीत प्रवास केला जात आहे. त्यात पावसाळ्यात मोरा मुंबई या जलमार्गावरील प्रवासाच्या तिकीटाचे दर वाढविण्यात येतात याचाही परिणाम प्रवासी संख्या घटण्यावर झाली आहे.
 
याचा सर्वांचा मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या बोट व्यवसायावर परिणाम झाला आहे. उरणवरून थेट मुंबई सीएसएमटी गाठता येत नसली तरी अवघ्या २० रुपयांत सर्वात स्वस्त व जलद गतीने मुंबईत जाता येत असल्याने लोकलने प्रवास करण्यास प्रवाशांनी पसंती दिली आहे. दुसरीकडे अटल सेतूने खासगी वाहनाने अवघ्या २५ मिनिटांत मुंबईत जाता येत असल्यामुळे या दोन्ही मार्गाचा अवलंब करीत प्रवास केला जात आहे.
 
पावसाळ्यात प्रवासी संख्या कमी असली तर इतकी कमी कधीच नव्हती त्यामुळे बोटींचा खर्चही निघत नसल्याची माहिती बोट चालकांनी दिली आहे. मेरिटाईम बोर्डाकडून चालविण्यात येणार्‍या मोरा मुंबई जलमार्गावरील प्रवासी संख्या अत्यंत कमी झाली आहे. दिवसाला ५०० प्रवासी प्रवास करीत होते, ती आता निम्म्यावर आली आहे. अशी माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे.