उरण | जैवविविधतेने नटलेल्या व पक्षी निरीक्षणाचे ठिकाण असलेल्या उरणमध्ये हजारोंच्या संख्येने परदेशी पक्षी येऊ लागले आहेत. मात्र येथील पाणथळींवर मातीचा भराव करुन बुजविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने उरणच्या अनेक पाणथळी कोरड्या झाल्या आहेत. परिणामी अनेक पक्षी आता नव्या पाणथळींच्या शोधत आहेत.
सध्या फ्लेमिंगोनी उरण रेल्वेस्थानक आणि शेवा गावाच्या परिसरातील पाणथळीवर आपला मोर्चा वळविला आहे. यात उरणच्या सर्वात मोठ्या पाणजे येथील वादग्रस्त २८९ हेक्टर पाणथळ परिसरात येणारे आंतरभरती पाण्याचे प्रवाह बंद करण्यात आल्याने ही पाणथळ कोरडी झाली आहे. पर्यावरणवाद्यानी यासंदर्भात पर्यावरण विभागाकडे तक्रारही केली आहे. परदेशी स्थलांतरित पक्षी येण्याचा हा काळ आहे. त्यामुळे पाणथळी कोरड्या झाल्याने पक्षीसंख्या ही घटण्याची शक्यता आहे.
नुकसानीची शहानिशा करुनही कोणतीही कारवाई झाली नसल्याबद्दल पर्यावरवादी कार्यकर्त्यांनी खेद व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जैवविविधता निर्दे शांकात भारत १८० देशांपैकी १७६ व्या क्रमांकावर आहे आणि ही वेळ आली आहे. उरणमधील जेएनपीए बंदर परिसर पाणजे, भेंडखळ आणि बेलपाडा येथील पाणथळी कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे या परिसरात येणारे पक्षी त्यांचे खाण आणि पाणी असलेल्या नव्या ठिकाणाचा शोधत आहेत. उरण रेल्वे स्थानक आणि नवीन शेवा गाव यांच्यामध्ये एक पाणथळ आहे.
येथे फ्लेमिंगो दर्शन होत असल्याची माहिती तेलीपाडा येथील नागरिक अशोक म्हात्रे यांनी दिली आहे. उरणमध्ये ३० स्थलांतरित पक्ष्यांसह किमान ५० प्रजातींचे पक्षी आकर्षित करणारी पाणजे पाणथळ आता आंतरभरतीच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा आणल्यामुळे कमी-अधिक प्रमाणात मृत पावत असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. तर पाणजे पाणथळ जमीन नष्ट झाल्याने उरणवर आपत्ती ओढवू शकते; कारण समुद्रभरतीचे येणारे पाणी आपला मार्ग शोधून इतर भागात पूर येईल.
खरे तर, आंतरभरतीयुक्त ओलसर जमीन पुरल्यामुळे गावांमध्ये आधीच अवेळी पूर येत आहेत, त्यामुळे सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन पाणजे पाणथळ जमिनीचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सरकारी आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की, खारफुटीच्या अस्तित्वामुळे पाणथळ जागा हे सीआरझेड क्षेत्र आहे आणि त्यामुळे भरतीच्या पाण्याचा प्रवाह अविरत असला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
नवी मुंबई विमानतळापर्यंत जाण्याचा धोका!
नैसर्गिक पाणथळी नष्ट होऊ लागल्याने स्थलांतरीत पक्षी उरणपासून पुढे सरकत सरकत नवी मुंबई विमानतळ परिसरात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.