उरण | ही स्फूर्ती देणारी भूमी आहे. पक्षाची पुनर्रचना करताना तरुणांना आणि महिलांना संधी द्या. ते संधीचे सोने करतील, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा दौर्याच्या निमित्ताने उरण येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात ८ फेबु्रवारी आयोजित करण्यात आलेल्या शेकापच्या कार्यकर्ते मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील, राजिपच्या माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शेकापचे जिल्हा खजिनदार प्रीतम म्हात्रे, राज्य महिला आघाडी प्रमुख ड. मानसी म्हात्रे, तालुका चिटणीस विकास नाईक, शहर चिटणीस शेखर पाटील, लाल ब्रिगेड संघटना अध्यक्ष अतिश भगत, महिला शहरचिटणीस नयना पाटील, महिला तालुका चिटणीस सीमा घरत, उरण शेकाप सहचिटणीस सुरेश पाटील, तसेच अन्य मान्यवर शेकापक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व काळातील चिरनेर जंगल सत्याग्रहाची भूमी आहे. कुळ कायद्याच्या अंमलबजावणी करणारी प्रमुख पक्षाच्या भूमी आहे. उरणमध्ये पक्षाचा झेंडा अ.ना. पाटलांनी रोवला. हे नवीन पिढीला माहीत नाही. स्वातंत्र्यानंतर १९५२ साली पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी सगळ्या सीट आपल्या विधानसभेत गेल्या होत्या. त्यानंतर तटकरेंचे वडील ए.बी. पाटील यांच्यासह ७५ टक्के पक्ष काँग्रेसमध्ये गेला होता. १९६७ मध्ये पाच आमदार आणि एक खासदार निवडून आला.
या निवडणुकीमध्ये आपण एकटे लढलो आणि आपल्या साडेचार लाख मते मिळविली. याची चर्चा कोण करत नाही का? ज्याने आपल्याला पाठिंबा दिला, त्यांनी आयत्या वेळेला फसवले. आपण दोन नंबरला आणि शिवसेना तीन नंबरला यातच आपला रिझल्ट लागला. उरणमध्ये जवळजवळ ४० वर्षे दत्ता पाटील, विवेक पाटील, मीनाक्षी पाटील यांच्या रूपाने आपले आमदार होते. या संपूर्ण महालन भागाला आपल्याला सांभाळायचं आहे. आता चेहरे नवीन निवडायला पाहिजे.
तरुणाला पक्षात प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी ही बैठक आहे. परंतु, महत्त्वाचे म्हणजे, पक्षात आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर तरुणांना आणि महिलांना प्राधान्य देऊन त्यांच्यावर जबाबदारी टाकली पाहिजे. पक्षाचे जिल्हा चिटणीस तालुका चिटणीस असतील त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी चर्चा करा, भांडणे करू नका.
त्यांना सूचना करा. आपली मते मांडा. आणि पक्षाचा विस्तार वाढवा. २० दिवसांनी व्यापक बैठक होणार आहे. ज्यांना आपण मोठे केले ते सगळे पळून गेले. या ठिकाणी काम करत असताना बदल करायचा आहे. उरणमध्ये पुढच्या वेळेला २०१ टक्के आमदार निवडून आणून दाखवू. पक्षात बदल घडवून आपल्याला जे जे पाहिजे ते निश्चित करून दाखवू. वेगळ्या पद्धतीने काम करा. आज पक्ष संघटना मग जिल्हा परिषदेच्या गोष्टी करा. बदल केला तरच आपला विजय आहे.
मागील अलिबागच्या निवडणुकीत महिलांनी निवडणुकीची जबाबदारी सांभाळली, अशी परिस्थिती होती. आपल्याला साडेचार लाख मते पडली. ती कोणाची मते होती. आपण प्रचारात कमी पडलो. आपल्याला शेतकरी, कामगार, वकील अशा सर्व क्षेत्रातील आघाड्या तयार करायच्या आहेत आणि पक्षाची ताकद वाढवायची आहे. विशेषतः येथे बहुसंख्य आगरी समाज असताना आगरी समाजाच्या विरोधात वेगवेगळी वक्तव्य करणारा आमदार, याला कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी अडवायचा आहे. सत्तेची घमेंड आणि पैशाचा माज उतरवायचा आहे, असे ते म्हणाले.
योग्य उमेदवार देणार
आगामी पालिका निवडणुकीत जिंकून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी देणार. २०१७ च्या पालिका निवडणुकीत सहकारी पक्षांनी दिलेल्या चुकीच्या उमेदवारांमुळे पालिकेवरील सत्ता थोडयात हुकली होती, अशी खंतदेखील जयंत पाटील यांनी व्यक्त केली.