कर्नाळा किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला; एका पर्यटकाचा मृत्यू

By Raigad Times    17-Feb-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | ट्रेकिंगसाठी शनिवारी कर्नाळा किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. यावेळी उडालेल्या धावपळीत एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून अन्य पाचजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संदीप गोपाळ पुरोहित असे मृत व्यक्तीचे नाव असून ते ४४ वर्षांचे होते.
 
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहणारे संदीप हे शनिवारी कुटुंबासोबत येथे आले होते. यावेळी शेकडो पर्यटक कर्नाळा किल्ल्यावर आले होते. यामध्ये मुंबई येथील एका महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मोठा समूह, त्यांचे काही पालक कर्नाळा किल्ल्यावर पर्यटनासाठी आले होते.
 
४० ते ५० पर्यटकांचा गोंधळ झाल्यामुळे मधमाशा भडकल्याने त्यांनी अनेकांना दंश केला. या घटनेची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांना समजल्यावर त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक विष्णू टोने यांच्यासह तेथे पोलीस पथक रवाना केले.
 
जखमींना पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर काही जखमींना पोलिसांनी स्वतः उपचारासाठी दाखल केले. संदीप यांच्या डोळ्याला मधमाशांनी दंश केला. त्यानंतर सैरावैरा धावणारे संदीप याच गोंधळात तेथे पडले. त्यांच्या डोक्याला दगड लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.