श्रीवर्धन | कार्ले अपघाती रस्ता दुरुस्तीची मागणी , अरूंद रस्त्याची साईडपट्टी खचल्याने अपघाताचा धोका

By Raigad Times    22-Feb-2025
Total Views |
 shreewardhan
 
दिघी |श्रीवर्धन तालुयातील बोर्लीपंचतन - श्रीवर्धन या सरळ मार्गावरील असुप ते बोर्ली शहरापर्यंत रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र, यातील कार्ले हद्दीतील अपघाती रस्त्याच्या दुरुस्तीला दिरंगाई होत असल्याने प्रवासाकरीता धोकादायक ठरत आहे. श्रीवर्धन - बोर्ली मार्ग हा १७ किमी अंतराचा घाट आणि वळणावळणाचा मार्ग आहे.
 
यामधील बोर्ली ते दांडगुरी दरम्यानचा अंदाजे चार किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. मात्र, कार्ले गावाजवळील धोकादायक वळणावरील रस्ता आद्याप रखडला आहे. रस्ता अरुंद असून, याची रुंदी आठ ते दहा फुट एवढीच आहे. दुचाकी, रिक्षा यांना प्रवास करताना समोरून येणार्‍या अवजड वाहनाना साईड देतेवेळी रस्त्याच्या खाली किती उतरायचे यावरून ये जा करणार्‍या दोन्ही वाहन चालकामध्ये पदोपदि वाद होण्याच्या घटना घडतच असतात.
 
चार दिवसांपूर्वी याच वळणावर मोटारससायकल व मिनिडोर यांच्यात अपघाताची घटना घडली. त्यामुळे धोका पाहता वाहनांचा प्रवास मोठा जिकरीचा ठरत आहे. याठिकाणी अरुंद रस्ते व तीर्व उतार असल्यामुळे वाहने भरधाव वेगाने येतात आणि अचानक अरुंद रस्ता असल्यामुळे वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी गडबडतात. अशावेळी अपघातालाहि सामोरे जावे लागते.
 
रस्त्यांच्या या ठिकाणी साईड पट्टी खचल्याने व पडलेल्या खड्डयामुळे दुचाकी वाहनचालकांचे वारंवार अपघात घडत आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून वाहने चालावी लागत आहे. प्रवासात आणखी कोणता अनर्थ घडू नये म्हणून रस्त्याची डागडुजी व रुंदीकरण करणे गरजेचे आहे. अशी मागणी प्रवाशी व वाहन चालकांकडून होत आहे.