अलिबाग | सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे १५ फेब्रुवारीपूर्वी आधार प्रमाणीकरण ई- केवायसी करणे बंधनकारक आहे. अन्यथा, ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना १५ फेब्रुवारीनंतर धान्य दिले जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.
लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्याकरिता गावोगावी कॅम्प आयोजित केले आहेत. याकरिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचे आहे. ही प्रक्रिया १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करावयाची आहे.
ई-केवायसी केले नाही तर १५ फेब्रुवारीनंतर धान्य दिले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. यासंदर्भात सर्व लाभार्थी व रास्तभाव धान्य दुकानदारांना १५ फेब्रुवारीपूर्वी १०० टक्के कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांनी प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेस अन्नदिन साजरा करुन लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरु करावे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये दर महिन्याच्या १५ तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करावे. अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानामध्ये जाऊन अन्नधान्याची उचल करीत आहेत. त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानामध्ये ई-केवायसी करुन घ्यावी. अन्यथा आपल्या गावी रास्तभाव धान्य दुकानात जाऊन केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत, असघंटीत कामगारांना मिळणार शिधापत्रिकेचा लाभ केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत/ असंघटीत कामगार ज्यांच्याकडे अद्याप रेशनकार्ड नाही, अशा कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेअंतर्गत तातडीने शिधापत्रिका वितरीत करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत स्थलांतरित /असंघटीत कामगारांना उत्पन्नानुसार शिधापत्रिका देण्याची कार्यवाही जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये सुरु आहे. त्यानुसार ज्या व्यक्तीनी स्वतःचे नाव ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत केलेले आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारच्या शिधापत्रिकेचा लाभ नाही, अशा व्यक्तींनी आवश्यक त्या कागदपत्रांसह जवळच्या तहसिल कार्यालयामध्ये संपर्क करुन शिधापत्रिका प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.