मुंबई | राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती एक्सवर दिली आहे. या नव्या निकषांनुसार या योजनेतून पाच लाख महिला आता अपात्र ठरणार आहेत. जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात दिले जात होते. आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. अदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, २८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणार्या महिलांना "मुख्यमंत्री..माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २ लाख ३० हजार महिलांना वगळण्यात आले आहे.
तसेच वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १ लाख १० हजार महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणार्या १ लाख ६० हजार महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत. विधानसभा निवडणुकांआधी जाहीर केलेल्या अनेक योजनांचा मोठा आर्थिक ताण शासकीय तिजोरीवर येत असल्याची ओरड होत होती.
यासाठी इतर योजनांचा निधी कमी केला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या दोन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.