तब्बल 6 फूट गाळ उपसला, परिसराची केली स्वच्छता
गौसखान पठाण/सुधागड-पाली : नदीवर असलेली जॅकवेल व बाजूचा परिसर गाळाने भरला आहे. परिणामी पालिकरांवर अनेकदा अघोषित पाणी टंचाईचे संकट ओढावते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकरांनी एकजूट केली असून रविवारी (ता.29) श्रमदान मोहिम राबविण्यात आली. यावेळी जॅकवेल मधील तब्बल 6 फूट व पाण्याच्या मार्गावर 4 ते 5 फूट साचलेला गाळ काढण्यात आला. व बाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
यावेळी ज्याला शक्य झाले त्याने प्रत्यक्ष सहभाग घेऊन तर कोणी आर्थिक मदत करून तर कोणी चहा, अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करून या मोहिमेत योगदान दिले. पाली गावाला येथील अंबा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. नदीलगत असलेल्या जॅकवेल मधून पंपाने पाणी काढून ते साठवण टाक्या व ग्रामस्थांना सोडले जाते. ही जॅकवेल व बाजूचा परिसर गाळ व चिखलाने भरला आहे. त्यामुळे पंपात चिखल, शेवाळ व केरकचरा जाऊन पंप नादुरुस्त होतात. तसेच गाळामुळे पाणी देखील मुबलक येत नाही. आणि या कारणांनी पालीत वारंवार पाणी पुरवठा बंद होतो. म्हणूनच एक संघर्ष समाजसेवेसाठी या ग्रुपतर्फे श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या श्रमदान मोहिमेत पाली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अनंत वालेकर, ग्रामपंचायत सदस्य भास्कर दुर्गे श्रीकांत ठोंबरे अजय मुळे, अमित निंबळकर, गणेश सातांबेकर, ड.नरेश शिंदे यांच्यासह अरिफ मणियार, सतिश शिंदे, माजी सरपंच गणेश बाळके, रोशन जोशी,एक संघर्ष समाजसेवेसाठी सदस्य संदेश सोनकर, कपील पाटील, संकेत खंडागळे, अनुज सरनाईक, स्वप्निल खंडागळे, रोशन रुईकर, योगेश राऊत, संतोष वडके,परेश वडके, मिलिंद गोळे, किशोर चौधरी, मोरेश्वर कांबळे, संजोग शेठ, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. श्रीकांत ठोंबरे , गणेश सातांबेकर, यांनी स्वतःच्या खर्चातून पंप उपलब्ध केले. तर अरिफ मणियार व संदेश सोनकर यांनी अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था केली.