मुंबई । कोकणात बीच शॅक टुरिझम, टेंट टुरिझम, होम स्टे टुरिझम कॉराव्हॅन टुरिझम यासह कृषी पर्यटन उभे करण्याची संकल्पना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे मांडली आहे. कोकणात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्यामुळे मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या विविध पर्यटन ठिकाणांच्या विकासाचा आराखडा करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोकणात पंचतारांकित हॉटेल्स गुंतवणूक करत आहेत. तसेच होम स्टेच्या माध्यमातून कोकणातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे सांगतानाच पर्यटन विकासासाठी व्यापक चालना दिली जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार योगेश कदम, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक धनंजय सावळकर उपस्थित होते.