उड्डाण पुलासाठी मुंबई-गोवा महामार्ग रोखणार , ८ ऑक्टोबरला रास्ता रोको

पुलाचे उंची व रुंदी याबाबत फेरविचार करण्याच्या सूचना देऊनही कारवाई नाही

By Raigad Times    07-Oct-2024
Total Views |
pen
 
पेण | तालुयातील मुंबई-गोवा महामार्गावरील कोलेटी येथे उभारण्यात येणार्‍या उड्डाणपुलाचा गाळा कमी रुंदीचा ठेवल्याने वरप, पाबळ भागात जाणारी एसटी बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाबळ खोर्‍यातील आदिवासी व कुणबी मराठा समाजात तसेच कोलेटी परिसरात तीव्र असंतोष पसरला असून या अन्यायाविरुध्द कोलेटी येथे ८ आटोबंर रोजी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरणार आहेत.
 
मुंबई गोवा महामार्गावरील कोलेटी येथे असणारा कमी उंचीचा अरुंद असणार्‍या उड्डाण पुलाची तक्रार शेतफळस, कोलेटी कोलेटीवाडी पाबळ खोर्‍यातील ग्रामस्थांनी अनेक वेळा केली आहे यासंदर्भात वीस दिवसापूर्वी खासदार सुनील तटकरे यांचे सोबत संबंधित अधिकार्‍यांचा दौरा झाला त्यावेळी लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन खासदारांनी पुलाचे उंची व रुंदी याबाबत फेरविचार करण्याच्या सूचना देऊनही या रस्त्याचे व पुलाचे काम करणारे अधिकारी यांनी हे काम चालू ठेवले आहे.
 
संबंधित अधिकार्‍यांनी या पुलाची उंची कमी करून त्याचा पाया कमी केल्याने दर पावसाळ्यात या गाळ्यात पुराचे पाणी शिरण्याचा धोका आहे. कारण दर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे अंबा नदीचे पाणी या गावात शिरते याची जाणीव येथील वृद्ध शेतकर्‍यांनी देऊनही रस्त्याचे अधिकारी येथील भौगोलिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता काम करीत आहेत. पाबळ खोरे हा पूर्णता आदिवासी विभाग असून येथे जांभोशीपर्यंत दिवसाच्या एसटीच्या फेर्‍या आहेत.
 
या भागात आदिवासींची मोठ्या प्रमाणात भाजीपाला व्यवसाय करतात, येथे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फार्म आहेत, वीट उद्योग केला जातो त्यामुळे या कमी उंची व अरुंद पूल असल्याने केवळ एसटी सेवाच बंद होणार नाही तर मालाची वाहतूक करणारे मोठे ट्रक देखील जाणार नसल्याने वीट पोल्ट्री उद्योगाची प्रचंड नुकसान होणार आहे.
 
या अन्यायाविरुद्ध लढणार्‍या कोलेटी शेतपळस, पाबळ खोरे विभाग अन्याय निवारण संघर्ष समितीने उभारलेल्या या लढ्याला येथील खार डोंगर मेहनत आघाडी ,कुणबी समाज विकास आघाडी, आदिवासी जाणीव जागृती विकास मंच, कष्टकरी महिला आघाडी या संघटनांनी पाठिंबा दिला असून सर्वपक्षीय स्थानिक लोकप्रतिनिधीदेखील ८ ऑटोबर रोजी या रस्ता रोको आंदोलनात सहभागी होणार असल्याचे या लढ्याचे संघटक गजानन भोईर यांनी सांगितले.