पोलादपूर । तालुक्याची उत्तरवाहिनी असणार्या सावित्री नदीपात्रात पोलादपूर शहरातून गोळा केलेला कचरा टाकण्याचे कृत्य हे राजरोसपणे सुरु आहे. या कृत्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून हरित लवादाकडून यापूर्वी सात लाख रुपयांचा दंड पोलादपूर नगरपंचायतीला ठोठावला होता. मात्र सातत्याने हेच कृत्य सुरु असल्याने पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते दिलीप भागवत यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात पोलादपूर नगरपंचायतीचा कचरा पुराच्या पाण्यात टाकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला. यानंतर नगरपंचायत प्रशासन कंत्राटी तत्वावर काम करणार्या कर्मचार्यांच्या जीवाशी खेळ करते का? असा प्रश्न देखील नेटकर्यांनी उपस्थित केला. पोलादपूर तालुक्याची उत्तरवाहिनी असणार्या सावित्री नदीपात्राच्या तिरावर पोलादपूर शहर, चरई,काटेतळी या गावांच्या पाण्याची जॅकवेल असल्याने सावित्री नदीतून होणार्या पाणी पुरवठ्यातून या गावांना पाणी जात असते.
मात्र सावित्री नदीत थेट टाकल्या जाणार्या कचर्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने पावसाळ्यात अनेक वेळा साथीच्या आजारांची साथ आल्याचे पाहावयास मिळते. सरकारी नियमानुसार नदीपात्रापासून 100 मीटर अंतरावर व महामार्गपासून 200 मीटर अंतरावर डम्पिंग ग्राउंड करण्याला प्रतिबंद असताना देखील स्मशानभूमीजवळील मोकळ्या जागेत डंम्पिंग ग्राउंड करण्यात आले आहे तर लेप्रसी रुग्णालयाच्या समोरील नदीपात्रात खुले आम कचरा टाकला जात आहे. शहरात मोकाट फिरणारी गुरे ही अनेक वेळा हा प्लॅस्टिक युक्त कचरा खात असल्याने मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लावणे क्रमप्राप्त बनले असून मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा विरोधी पक्ष नेते दिलीप भागवत यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.