शेकापचे यावर्षी पंंढरपूर येथे अधिवेशन; विधानसभा प्रचाराचा नारळ फोडणार

By Raigad Times    17-Jul-2024
Total Views |
 sekap
अलिबाग | शेकापचे यावर्षीचे अधिवेशन पंढरपूर येथे होणार असून येथेच मंदिरातून विधानसभा निवडणूकीचा नारळ फोडण्यात येणार आहे. २ ऑगस्टपासून दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात रायगड जिल्ह्यातील शेकाप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन शेकापनेते जयंत पाटील यांनी केले आहे.आ. जयंत पाटील पराभवानंतर शेकापनेते जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच साधला कार्यकर्त्यांशी संवाद यांचा नुकताच विधानपरिषदेच्या निवडणूकीत पराभव झाला होता.
 
त्यानंतर प्रथम त्यांना मंगळवारी ( १६ जूलै) अलिबाग येथे शेकाप भवन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा पराभवाने खचणारा नाही. कष्टकरी, कामगारांसाठी लढणारा, कायम आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणार्‍या शेकापची भुमिका आणि धोरणे वेगळी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात, राज्यात शेतकरी कामगार पक्षाने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. विद्यमान आमदार टक्केवारी घेऊन काम करतात. ही प्रकृती वाढल्यास तालुयाचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे नुकसान होईल. शेकापने कायम संघर्षातून अस्तित्व निर्माण केले आहे. स्व. नाना पाटील, स्व. प्रभाकर पाटील,स्व. दत्ता पाटील या लढवय्या नेत्यांनी जिल्ह्यात वेगळे अस्तित्व निर्माण केले. विरोधी पक्षनेता म्हणून आजही शेकापला मान-सन्मान आहे. ही ओळख पुन्हा निर्माण करायची आहे. आगामी काळात खचून न जाता निवडणूकीत विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे. शेकाप पुन्हा इतिहास घडवेल, असे प्रतिपादन माजी आ. जयंत पाटील यांनी केले.