नवीन पनवेल | जुना मुंबई पुणे महामार्गावर बारवई गाव येथे कार उलटून झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. अजय विष्णू गिरे (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. २१ जुलै रोजी अजय गिरे याच्यासह गोपाळ माळी, दत्ता माळी, ज्ञानेेशर माळी, निलेश मुंजळकर, गजानन देवकर हे सहा जण अर्टिगा कारने एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते मित्राच्या घरी तळेगाव येथे गेले. २२ जुलै रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जेवण करून परत येण्यासाठी निघाले. लोणावळा येथे चहा पिऊन झाल्यानंतर गाडी अजयने चालवण्यास घेतली. मंगळवारी (२३ जुलै) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जुना मुंबई पुणे महामार्गावर बारवई गाव या ठिकाणी तालीम एंटरप्राइजेस कंपनीसमोर आले असता अजयचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी भरधाव वेगाने रस्त्याच्या खाली गेली व उलटी झाली.
या अपघातात सहाही जण जखमी झाले. यापैकी अजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अजय, दत्ता आणि गोपाळ यांना अॅम्बुलन्समधून उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे नेण्यात आले तर दुसर्या अॅम्बुलन्समधून गजानन, ज्ञानेेशर व निलेश यांना एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी अजय गिरे याला तपासून मृत घोषित केले.