श्रीवर्धन | दिघी - एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाची विविध मार्गाने धडपड सुरू आहे. मात्र, श्रीवर्धन तालुयातील गावांना शहराकडे जोडणारी मुंबई एसटी गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे.
धनगरमलई मार्गे म्हसळा ते मुंबई असा प्रवास येथील सालविंडे, वरवटणे, धनगरमलई, कासारकोंड, नागलोली मधलीवाडी, नागलोली, नागलोली नवीवाडी, देवखोल, बोर्ला, बोर्ला रसाळवाडी, वावेपंचतन अशा अकरा गावांसाठी मुंबईकडे जाणार्या व मुंबईहून परतणार्या प्रवाशांना एकही गाडी नसल्याने प्रवाशाची गैरसोय झाली आहे.
तीन वर्षापूर्वी याच मार्गावरून सर्वा - मुंबई, दिवेआगर - मुंबई व श्रीवर्धन - मुंबई या तीन गाड्यांचा प्रवास नियमित व सुरळीत सुरू होता. कारण येथील अनेकजण कामानिमित्त मुंबईस्थित असल्याने कित्येक वेळा या आडमार्गावर मिळणारी एसटीची सुविधा ही प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत होती. राज्याच्या एकाटोकापासून शेवटच्या टोकापर्यंत एस टी पोहचली आहे.
मात्र, प्रवाशांच्या सेवेसाठी असणारी एस टी बंद असल्यामुळे या गावातील प्रवाशांना मुंबई जायचे असेल तर बोर्लीपंचतन किंवा म्हसळा बस स्टॅड मध्ये यावे लागते. वेळेत गाडी पकडण्यासाठी रिक्षा कींवा खाजगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. गेली तीन वर्ष सातत्याने मुंबई गाडीसाठी मागणी होत असुन, लवकरात सेवा सुरु करण्यात यावी व कायमस्वरूपी सुरु रहावी, अशी मागणी येथील प्रवासीवर्गाकडून होत आहे.
श्रीवर्धन आगाराला चालक वाहकांसह गाड्यांची कमतरता आहे. वाहनांची संख्या वाढली का या गावांना बंद असणारी एसटी सुविधा सुरु करण्यात येईल. - महेबुब मनेर, आगार प्रमुख, श्रीवर्धन.
मुंबईहून गावाला जाणे किंवा येणे कठीण बनले आहे. निघतानाच विचार करावा लागतो कोणती गाडी मिळेल व परतीचा प्रवास कसं होईल. नाहीतर मग बोर्ली, म्हसळा त्यापुढे माणगाव अशी बसस्थानक घेत रखडपट्टी होत जाते. आम्हा मुंबईकरांना गावी येणे त्रासदायक बनले आहे. - सुनील रिकामे, प्रवासी